ताज्या बातम्या

८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब ; काय आहे प्रकरण ?


सरकारी चलन छापखान्यांमध्ये एकूण ८८१०.६५ दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली. पण यापैकी केवळ ७२६०.६५ दशलक्ष नोटाच भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे पोहचल्या. याचा अर्थ तब्बल ८८०३२.५ कोटी मूल्याच्या नोटा चलनात येण्याआधीच गायब झाल्या. याबाबत चौकशीसाठी ‘नवशक्ति’च्या प्रतिनिधीने सलग तीन दिवस आरबीआय प्रवक्ते योगेश दयाल यांना मॅसेज पाठवले, इमेल केले, पण आरबीआयने एकदाही प्रतिसाद दिला नाही.



मोठ्या नोटा चलनात आल्यानंतर राजकीय नेते आणि व्यापारी काळा पैसा जमवण्यासाठी नोटांचा साठा करतात आणि चलनातून नोटा बाहेर जातात हे वास्तव असतांना छपाईखान्यातून आरबीआयकडे पोहचण्याआधीच नोटा गायब होण्याचा एक प्रकार उघडकीस आल्यामुळे हे काय गौडबंगाल आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

आपल्या देशात भारतीय रिझर्व्ह बॅंक नोट मुद्रा प्रायव्हेट लिमिटेड बंगळुरु, नाशिक करन्सी नोट प्रेस, आणि देवास येथील बॅंक नोट प्रेस या ठिकाणी चलनी नोटांची छपाई करुन घेते. छपाई झाल्यानंतर या नेाटा भारतीय अर्थव्यवस्थेत वितरण करण्यासाठी आरबीआयकडे पाठवल्या जातात. आरबीआय या नोटा आपल्या सुरक्षित कक्षात जमा करते. माहिती अधिकार हक्क (आरटीआय) कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१६ दरम्यानच्या कालावधीत नाशिकच्या सरकारी छापखान्यात नव्या डिझाईनच्या ५०० रुपयाच्या ३७५.४५० दशलक्ष नोटा छापण्यात आल्या. मात्र आरबीआयला यापैकी केवळ ३४५ दशलक्ष नोटाच प्राप्त झाल्या. एका अन्य आरटीआय माहितीनुसार नाशिक छापखान्याकडून माहिती मिळवण्यात आली. त्यानुसार आर्थिक वर्ष एप्रिल२०१५ ते मार्च २०१६ मध्ये आरबीआयला ५०० रुपयांच्या २१० दशलक्ष नोटा पुरवण्यात आल्या. तेव्हा रघुराम राजन हे आरबीआयचे गव्हर्नर हेाते. तसेच नाशिक छापखान्याच्या अवालानुसार नव्या डिझाईनच्या नोटा आरबीआयला पुरवण्यात आल्या. मात्र आरबीआयच्या वार्षिक अहवालात नव्या डिझाईनच्या ५०० रुपयाच्या नोटा प्राप्त झाल्याचा उल्लेखच नाही.

नाशिक छापखान्याकडून मिळालेल्या पुढील माहितीनुसार २०१६-१७ साली आरबीआयला १६६२ दशलक्ष ५०० रुपयांच्या नव्या डिझाईइनच्या नोटा आरबीआयला पुरवण्यात आल्या. तसेच बंगळुरु येथील छापखान्यातून ५१९५.६५ दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा, तसेच देवास येथील छापखान्याकडून १९५३ दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा २०१६-१७ मध्ये आरबीआयला पोचत्या करण्यात आल्या. मात्र आरबीआयला या तीन्ही छापखान्यांकडून केवळ ७२६० दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा प्राप्त झाल्या. म्हणजेच तीन्ही छापखान्यांनी मिळून एकूण ८८१०.६५ दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा छापल्या. मात्र आरबीआयला यापैकी केवळ ७२६० दशलक्ष नोटाच प्राप्त झाल्या.

भारतासारख्या अर्थव्यवस्थेतून १७६०.६५ दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा गायब होणे ही काही लहान बाब नाही. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची सुरक्षा आणि स्थैर्य धेाक्यात येऊ शकतात, असे मत मनेारंजन रॉय यांनी व्यक्त केले असून केंद्रीय आर्थिक गुप्तहेर संस्था आणि ईडीला याबाबत तपास करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

दरम्यान आरबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नेाटांची छपाई आणि पुरवठा यांची माेठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे काही नेाटा अजून आरबीआयकडे पोहचण्याच्या वाटेवर असू शकतील. आरटीआय उत्तर देतांना त्यांची नीट मेाजणी झाली नसेल, असे सांगून नोटांच्या गहाळ होण्याचे कारण पुढे केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button