ताज्या बातम्या

फौजदाराचा जमादार झाल्याने तोल ढळला; ‘सामना’तून फडणवीसांवर टीकास्त्र


मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मी पुन्हा येईन हे सांगून थकलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.त्यातही पुन्हा अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री करून त्यांची आणखी अवहेलना झाली. फौजदाराचा जमादार झाल्याने त्यांचा तोल ढळला असून ते आता अहंकाराचे महामेरू झाले आहेत अशी टीका यात करण्यात आली आहे.



 

ते अनेकदा अर्धग्लानी अवस्थेत असतात रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही. भांगेची नशा दुपारीच अधिक चढते, हे लक्षण त्यांच्यात सध्या दिसत असून एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहेत, अशी टीकाही यात करण्यात आली असून फडणवीस सांभाळा असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

 

सन 2019 च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देतही त्यांच्यावर यात टीका करण्यात आली आहे. ज्या अजित पवारांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होंते आता त्यांच्याच बरोबर त्यांना बसायला लागत आहे. त्यांना बाजुला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पुजा सांगत आहेत काय असा सवालही यात करण्यात आला आहे. उप झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आहे. ते आता अहंकाराचे महामेरू बनले आहेत.

 

मंत्रिमडळाचा विस्तार होऊ शकला नाही, अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री मिळू शकला नाही त्यावर फडणवीस काहींच करू शकत नाहीत असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान या अग्रलेखातील भाषेवर भारतीय जनता पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. या मुखपत्रातील अग्रलेखाच्या भाषेला लगाम घालण्यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार द्यावी लागेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button