ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

राज्यपाल बदलले 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची वाचा संपूर्ण यादी


महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



नवी दिल्ली : देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सध्या कोणत्याही राज्याचे राज्यपाल करण्यात आलेले नाही.

गुलाबचंद कटारिया आसामचे राज्यपाल : राजस्थानमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे लक्ष्मण आचार्य, शिव प्रताप शुक्ला, सीपी राधाकृष्णन यांची अनुक्रमे सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची अधिसूचना राष्ट्रपतींनी जारी केली आहे. यामध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे नवे महामहिम राज्यपाल बनवण्यात आले आहे. तर विद्यमान राज्यपाल फागू चौहान यांची नियुक्ती मेघालयला करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे एलजी राधाकृष्ण माथूर यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. रमेश बैस हे आतापर्यंत झारखंडचे राज्यपाल होते.

विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात त्यांनी स्वतःहून केली होती. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी खालीलप्रमाणे :

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम
सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button