बीड दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाचा बोजा शेतकऱ्याने संपवले जीवन
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/11/Screenshot_20231125_152756-1.jpg)
बीड : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बँकेच्या व खासगी कर्जाचा वाढता बोजा आणि कारखान्याकडून घेतलेली उचल कशी फेडायची या आर्थिक विवंचनेत पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर येथील शेतकरी व ऊस तोडणी कामगार संजय गंगाराम मोहळकर (वय ५२) याने आत्महत्या केली.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली.
पावसाळ्यात शेती करायची व उर्वरित कालावधीत कारखान्याची उचल घेऊन ते ऊस तोडणीला जात. यातून कुटुंबाचा गाडा हाकताना सततच्या दुष्काळी परिस्थीतीमुळे शेती पिकत नाही. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज, कारखान्याची उचल, खाजगी कर्ज यांची परतफेड होत नसल्याने हताश होऊन संजय मोहोळकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे या शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.