ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर,लोकप्रतिनिधींवर हल्ले,गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा


बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक संस्था, सहकारी संस्थांच्या इमारतीवरही दगडफेक केली. तसेच संस्थासंमोर टायर जाळण्यात आले. तेथून हे आंदोलक नगर पालिकेत गेले. तेथेही जाळपोळ करून दगडफेक केली. सध्या तरी शहरात तणावाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. आंदोलकांकडून आ.सोळंके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन तीव्र झाले आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावरुन, खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच, त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली.



महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.‌ याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापूर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button