ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदारांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता, पीडित कुटुंबीयाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण


 



नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात घोगरगाव इथे तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत एकदा खुला केलेला रस्ता पुन्हा अडवण्याचा प्रकार समोर आले आहे. तहसीलदारांनी तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर देखील दलित वस्तीअंतर्गत जाणारा रस्ता बंद केल्याने पीडित कुटुंबीय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नगर समोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला अण्णासाहेब कणगरे आणि त्यांच्या कुटुंबीयाची मौजे घोगरगाव येथील गट क्रमांक 255 आणि 256 मध्ये जमीन असून त्यांच्या घराकडे आणि शेतीकडे जाण्याचा रस्ता त्यांच्याच भावकीतील अविनाश नाना कणगरे , वसंत नाना कणगरे , प्रभाकर नाना कणगरे यांनी अडवून ठेवल्याप्रकरणी तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारदार कुटुंबीयांनी अर्ज दाखल केलेला होता. तहसीलदार यांनी 2017 मध्ये हा रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करून दिला. त्यानंतर या रस्त्याचे काही प्रमाणात खडीकरण आणि मुरुमीकरण देखील करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा जून महिन्यानंतर हा रस्ता अडवण्यात आलेला असून हा रस्ता खुला करावा या मागणीसाठी शकुंतला कणगरे यांच्या कुटुंबीयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे

उपोषणासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले आहे. त्यामध्ये त्यांच्या घरात शाळेत जाणारी मुले असून शाळेत ये जा करणे त्यांना अशक्य झालेले आहे. रस्ता बंद केल्यामुळे शेतात मशागत करण्यासाठी जाता येत नाही आणि शेतजमीन देखील पडीक झालेली आहे. ज्या व्यक्तींनी हा रस्ता अडवलेला आहे त्यांना राजकीय पाठबळ असल्याकारणाने सरकारी निधीत देखील त्यांनी फेरफार करत कणगरे कुटुंबीयांवर अन्याय सुरू केलेला आहे. आरोपींनी याआधी देखील उपोषणकर्त्या कुटुंबियांच्या घरातील महिलांना मारहाण केलेली आहे. वेळोवेळी तहसीलदार साहेब , पोलीस स्टेशन नेवासा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी देऊन देखील हा रस्ता खुला करण्यात आलेला नाही असे उपोषणकर्त्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

प्रतिनिधीशी बोलताना शकुंतला कणगरे यांच्या कुटुंबीयांनी , आरोपींनी या आधी देखील आमच्या घरातील महिलांना मारहाण केलेली असून आरोपी व्यक्ती हे आधी तुरुंगात जाऊन आलेले आहेत आणि कोणाला जुमानतही नाहीत . सरकार दरबारी आपल्याला कुठलाही न्याय मिळत नाही तर दुसरीकडे आरोपीची पाठराखण प्रशासनाकडून सुरू असल्याने आपल्या जीविताला देखील धोका आहे असे सांगत 12 तारखेपासून त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. कणगरे कुटुंबियांच्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी नेवासा सोबतच केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button