ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी


अहमदनगर:गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून, अतोनात नुकसान झाले आहे.
त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून, मराठवाड्यातील धाराशिव येथील भागातील देखील पाहणी करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.



अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात 9 एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची आज (11 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. सरकार तुमच्यासोबत असून लवकरात लवकर तुम्हाला मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिली. तर वनकुटे गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून या शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून मुख्यमंत्री यांनी संवाद साधला. या पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उभारणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच वनकुटे मधील पडझड झालेल्या 22 कुटुंबाना तात्काळ शबरी घरकुल योजनेमधून घरकुल घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील गावात गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, या शेतकऱ्यांना नक्की मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तर शेतकरी बांधवांशी बोलताना, पंचनामे पूर्ण झाल्यावर आठवडाभरात नुकसान भरपाई देऊ असे सांगून आश्वस्त केले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला 10 किलो गहू व तांदळाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही केले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते.

कृषीमंत्रीही शेतकऱ्यांच्या बांधावर…

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात देखील याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तर झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देखील प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button