रामदास आठवलेंनी घेतली दलाई लामांची भेट, स्वीकारले जागतिक धम्मपरिषदेचे निमंत्रण
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_20231204_213514-1.jpg)
मुंबई : जागतिक बौध्द धम्मगुरु दलाई लामा यांची धर्मशाळा येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज (ता.04 डिसेंबर) सदिच्छा भेट घेतली. येत्या दि.16 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समिती तर्फे आयोजित जागतिक धम्म परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण रामदास आठवले यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्रातील आंबेडकरी; बौध्द जनतेशी मला संवाद साधायचा आहे. त्यामुळे मी नक्की मुंबईत आयोजित धम्मपरिषदेत उपस्थित राहणार असल्याचे सांगत पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांनी रामदास आठवले यांनी माहिती दिली. धम्मपरिषदेचे निमंत्रण स्विकारले. यावेळी रामदास आठवले यांच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीचे सरचिटणीस अविनाश कांबळे, खजिनदार पद्मश्री कल्पना सरोज हे उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवले. लाखो अनुयायांसह डॉ.बाबासाहेबांनी धम्मदिक्षा घेतली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहिर केला होता. मात्र त्या पूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात धम्मदिक्षा सोहळा आजोजित करण्याचा त्यांचा संकल्प अधुरा राहिला. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी यंदा 16 डिसेंबर 2023 रोजी ऐतिहासिक धम्मपरिषद मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स वर आयोजित करण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांना दिली. या जागतिक धम्म परिषदेला आपण जरुर उपस्थित राहू असे आश्वासन पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांनी रामदास आठवले यांना दिले.
वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट या जागतिक बौध्द संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मानद उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची नुकतीच बँकॉक येथे निवड झाल्याबद्दल जागतिक धम्मगुरु दलाई लामा यांनी आठवले यांचे यावेळी अभिनंदन केले.
जगात मोठ्या प्रमाणात नरसंहार करणारे घातक शस्त्रास्त्र निर्माण होत आहे. हि घातक शस्त्र नष्ट केली पाहिजेत. जगात शांतता या तत्वाचे हत्यार निर्माण झाले पाहिजे. अहिंसा आणि शांती यामुळेच मानव कल्याण होईल. भगवान बुध्दाच्या तत्वप्रणालीत शांतता अहिंसा या तत्वाना महत्व दिले आहे. जगाला या युध्द नाही तर बुध्दाची गरज आहे. शांततेला बौध्द धम्मात फार महत्व असल्याचा उपदेश दलाई लामा यांनी यावेळी दिला. मी तिबेट मधुन आलो असलो तरी मी भारतीय आहे. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे असे यावेळी दलाई लामा म्हणाले.
जागतिक बौध्द धम्मगुरु म्हणुन बौध्द जनता आपला आदर करते भारत सरकार आपल्या सोबत आहे, त्याच बरोबर सर्व भारतीय आणि भारतातील बौध्द जनता आपला आदर करते असे रामदास आठवले यांनी पुज्य दलाई लामा यांना सांगितले.