राज्यातील शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023-06-17-17-05-35-87_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
पुणे : कोरोनाचे दोन वर्षे आणि मागील वर्षी बदल्यांसाठीचे नवीन आलेले ऑनलाईन सॉफ्टरवेअर यामुळे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या.
तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवीन बदली धोरणानुसार राज्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील मिळून बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यातील एकूण १० हजार ९० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. नवीन सॉफ्टवेअर प्रणालीनुसार झालेली ही पहिलीच बदली प्रक्रिया आहे. आता बदल्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची माहिती दिलीय.
काय म्हणाले दीपक केसरकर
पुण्यात जी २० परिषद होतेय याचा आम्हाला अभिमान आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. हे सांस्कृतिक शहर आहे. यामुळे भारतीय संस्कृतिचे दर्शन जगभरातून आलेल्या लोकांना होणार आहे. शाळेच्या गणवेश बाबत आपण भूमिका जाहीर केली आहे. कोणतीही शाळा अमुक एका दुकानातून गणवेश घ्या, असे आग्रह करु शकत नाही. जर एखादी शाळा असे म्हणत असेल तर त्या शाळेची चौकशी होईल. सर्व शाळांनी एकसारखा कपडा घ्यावा, पण त्याची किंमत कमीत कमी असली पाहिजे. त्यातून नफेखोरी होती काम नये.
बदल्यासंदर्भात काय होणार निर्णय
शिक्षकांचा सातत्याने बदल्या झाल्या तर शिक्षकांवरही परिणाम होतो. तसेच शाळेवर परिणाम होत असतो. शिक्षकांनाही त्या शाळेत लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे प्रशासकीय शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्या, अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्रालय आणि शालेय शिक्षण मंत्रालय लवकरच धोरण ठरवणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी
शिवसेनेने दिलेल्या त्या जाहिराती बाबत कुठलाही वाद नाही. तो एवढा मोठा विषय नाही. राज्यातील इतर विषयावर आम्हला काम करायचे आहेत, तो विषय आता मिटला आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तरावर मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री सविस्तर बोलतील, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा त्यांनाच अधिकार, मी पक्ष प्रवक्ता आहे, मी राज्याबाबत बोलेन, असेही त्यांनी सांगितले.
सध्या काय आहे नियम
नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत सामावेश केला आहे. एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील ६ हजार ६९० आणि संवर्ग दोनमधील ३ हजार ४०० शिक्षकांचा समावेश केला आहे.