महाराष्ट्रराजकीय

फरार नीरव मोदीची संपत्ती अमरावतीत; प्रकरण उजेडात येताच बच्चू कडू कडाडले, म्हणाले..


अमरावती : 14 हजार कोटींचा बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी (Nirav Modi) याची संपत्ती अमरावती जिल्ह्यातील (Amravati News) चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



त्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेक तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीचे अमरावतीतील नेमकं कनेक्शन काय? हे शोधून काढणे हे सरकारपुढचं मोठे आव्हान ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील तळवेल येथील सर्व्हे क्रमांक 313 मध्ये 25 आर, म्हणजेच 2500 चौरस मीटर जमीन नीरव मोदी याच्या नावे असल्याची नोंद आहे. या जमिनीवर पंजाब नॅशनल बँकेकडून 30 जून 2018 रोजी कर्ज घेतल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. यात 14.30 टक्के दराने व्याजासह 8 लाख 62 हजार 951 रुपयांची थकबाकी दर्शविण्यात आली आहे. मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी आशुकुमार यांच्या स्वाक्षरीने नीरव मोदी याच्या नावे असलेली 2500 चौ. मी.जमीन जप्त करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.

त्यांच्या शेतात काय सोनं पिकतं का?- बच्चू कडू

याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, निरव मोदी सारख्या व्यक्तीची जमीन चांदूरबाजार तालुक्यातील तळवेल सारख्या गावात सापडण म्हणजे संशयास्पद आहे. इतक्या विदर्भात येऊन निरव मोदी गाव खेड्यात येऊन पोहचत आहे. म्हणूण याचा योग्य तपास झाला पाहीजे, अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना नॅशनल बँक कमिशन घेतल्या शिवाय कर्ज देत नाही. मात्र, निरव मोदीसारख्या व्यक्तीला अर्ध्या एकरावर 9-9 लाख रुपये कर्ज देते. त्याच्या शेतात काय सोनं पिकतं का, हा विचार करण्याची वेळ आहे. या देशामध्ये सामान्य माणसासाठी कायदे आहे. मोठ्या लोकांसाठी कायदे नाहीत, हे यातून स्पष्ट होतंय. त्यामुळे आता या प्रकरणी सत्य बाहेर येईल का हे पाहावे लागेलच. मात्र या प्रकरणाची वेळीच चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

प्रकरणाच्या चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी

तर याविषयी अधिक माहिती देतांना तळवेल येथील ग्रामस्थांनी एबीपी माझाला माहिती दिली की, नीरव मोदी यांनी जमीन केव्हा घेतली हे आम्हाला माहिती पण नाही. पण आज कळलं की अर्ध्या एकर जमिनीवर बँकेने तब्बल 9 लाख रुपये कर्ज दिले आणि आमच्या सारख्या शेतकऱ्यांना केवळ 3 हजार एकरी कर्ज देतात. त्यामुळे या प्रकरणी योग्य चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button