जनरल नॉलेजताज्या बातम्यादेश-विदेशधार्मिकमहत्वाचेलोकशाही विश्लेषण

भारतातील एक असे मंदिर जिथे आजही देव आहे जिवंत; 150 पायऱ्यांनंतर होते देवाचे दर्शन,मूर्ती दगडी नसून मानवी त्वचेसारखी मऊ असल्याची श्रद्धा …


तेलंगणातील मल्लूर येथील हेमाचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर आहे.
इथली देवाची मूर्ती दगडाप्रमाणे कडक नसून मूर्ती दगडी नसून मानवी त्वचेसारखी मऊ असल्याची श्रद्धा आहे.
हे मंदिर रहस्य आणि श्रद्धेचा अद्भूत संगम आहे.

आपण आजवर अनेक मंदिरे पाहिली आहेत, जिथे देव समोर विराजमान असतात आणि भाविक त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावतात. बहुतेक वेळा देवतांच्या मूर्ती संगमरवरी दगड, पाषाण किंवा धातूपासून बनलेल्या असतात आणि त्यांची रोज विधीपूर्वक पूजा केली जाते. मात्र भारतात एक असे अनोखे मंदिर आहे, जिथे देवाची मूर्ती “जिवंत” असल्याचा विश्वास आहे. येथे लोक केवळ श्रद्धेनेच नाही, तर ही अद्भुत सत्यता अनुभवण्यासाठीही मोठ्या संख्येने येतात.

आपण बोलत आहोत तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील मल्लूर गावात असलेल्या हेमाचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराबद्दल. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० फूट उंच पुट्टकोंडा नावाच्या डोंगरावर वसलेले आहे. स्थानिक श्रद्धेनुसार, भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामींचा विग्रह या डोंगरातून स्वयंभू स्वरूपात प्रकट झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शिखांजनेय स्वरूपातील हनुमानजींचे दर्शन घडते. त्यांना मल्लूर गावाचे रक्षक देव मानले जाते.

युट्यूबरने केलेला दावा काय आहे?

एका युट्यूबरने या मंदिराबाबत एक आश्चर्यकारक दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, भारतात हे एकमेव असे मंदिर आहे जिथे भगवान नरसिंहांची मूर्ती आजही जिवंत असल्यासारखी भासते. त्याने सांगितले की ही मूर्ती सुमारे ४ हजार वर्षे जुनी मानली जाते आणि ती दगडासारखी कठीण नसून मानवी त्वचेसारखी मऊ आहे.

त्याच्या दाव्यानुसार, सुमारे १० फूट उंच असलेली ही मूर्ती इतकी मृदू आहे की तिच्यावर फूल ठेवून हलके दाबले, तरी ते फूल आत शिरते. काहींच्या मते जास्त दाब दिल्यास मूर्तीतून रक्तासारखा द्रवही बाहेर येतो. मूर्तीच्या नाभी भागातून कायम एक लालसर द्रवस्राव होत असल्याचे सांगितले जाते, तो थांबवण्यासाठी चंदनाचा लेप लावला जातो. मंदिरातील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की मूर्तीच्या जवळ गेल्यावर श्वासोच्छ्वास होत असल्याची जाणीव होते. त्यामुळे अनेक भाविकांचा विश्वास आहे की येथे भगवान नरसिंह स्वामी स्वतः वास्तव्यास आहेत.

भगवानांच्या चरणांतून उत्पन्न झालेली जलधारा

या मंदिराजवळून एक पवित्र जलधारा वाहते. ती भगवान नरसिंहांच्या चरणांतून उत्पन्न झाली असल्याची मान्यता आहे. ऐतिहासिकदृष्ट्या राणी रुद्रम्मा देवी यांनी या जलधारेला “चिंतामणी” असे नाव दिले होते. स्थानिक लोक तिला “चिंतामणी जलपथम” म्हणून ओळखतात. या पाण्याला औषधी आणि पवित्र गुणधर्म असल्याचे मानले जाते. अनेक भाविक या पाण्यात स्नान करतात किंवा ते पाणी बाटल्यांमध्ये भरून घरी घेऊन जातात.

श्रद्धा, शांतता आणि आशीर्वाद

दूरदूरहून भाविक या मंदिरात मानसिक शांती, समाधान आणि देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून येतात. येथे दर्शन घेतल्याने दुःख दूर होतात, सुख-समृद्धी प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात, असा दृढ विश्वास आहे. विशेषतः निसंतान दाम्पत्य येथे प्रार्थना केल्यास त्यांना संतानसुख लाभते, असेही मानले जाते. जवळपास १५० हून अधिक पायऱ्या चढून जे भक्त दर्शन घेतात, त्यांना भगवान नरसिंहांचे विशेष आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे.

मंदिर दर्शनाची वेळ

हेमाचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर भाविकांसाठी ठरावीक वेळेत खुले असते. सकाळी ८:३० ते दुपारी १:०० या वेळेत दर्शनासाठी मंदिर खुले असते. दुपारी १ नंतर काही वेळ मंदिर बंद राहते आणि पुन्हा दुपारी २:३० वाजता उघडते. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत दर्शन घेता येते. स्थानिक समजुतीनुसार, सायंकाळी ५:३० नंतर भगवान नरसिंह मंदिर परिसर आणि आसपासच्या जंगलात भ्रमण करतात, म्हणून त्यानंतर दर्शन बंद केले जाते.

मंदिरापर्यंत कसे पोहोचाल?

या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत.
रस्तेमार्ग: वारंगल, मणुगुरू तसेच भद्राचलम-एदुलापुरम मार्गावरून मल्लूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. खासगी वाहन, टॅक्सी किंवा कॅबनेही येथे जाता येते.
रेल्वेमार्ग: मल्लूरजवळील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मणुगुरू (BDCR) आहे.
हवाई मार्ग: हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून तेथून रस्ते किंवा रेल्वेमार्गे मल्लूर गाठता येते.
हेमाचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, श्रद्धा, रहस्य आणि अद्भुत अनुभव यांचा संगम आहे. म्हणूनच आजही हजारो भाविक येथे येऊन “जिवंत देवाचे” दर्शन घेण्याचा अनुभव घेतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button