ताज्या बातम्यामहाराष्ट्र

माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गुंडांवर पोलिसांची करडी नजर


पुणे: पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी दिला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, नागरिकांची बैठक पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्योजक, नागरिक सहभागी झाले होते. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, आनंद भोईटे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फुलारी म्हणाले, ‘राजकीय दबावाला बळी न पडता खंडणीखोरांच्या विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. माथाडी संघटनेच्या नावाखाली कोणी खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी.’

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत गस्त घालण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. रांजणगाव, चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक विषयक उपाययोजना करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक कोंडी सोडविणे तसेच नियमनासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. खंडणीखोरांच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

औद्योगिक वसाहतीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातत्याने उद्योजकांशी संवाद साधण्यात येणार आहेत. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहेत. या भागात पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे फुलारी यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी खंडणीखोरांच्या विरुद्ध कारवाई सुरू केल्याने औद्योगिक वसाहतीत शांतता प्रस्थापित झाली असल्याचे उद्योजकांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गस्त घालण्यासाठी पोलिसांना गृहविभागाकडून दुचाकी देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ प्रतीक्षा रामदास बागडी हिचे वडील सांगली पोलीस दलात कर्मचारी आहेत. फुलारी यांच्या हस्ते प्रतीक्षाचा सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील उद्योजक आणि सामान्य नागिरकांना विश्वास देण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यात याव्यात. राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. -सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button