ताज्या बातम्यामहाराष्ट्र

१५ एप्रिलपर्यंत संपणार अंतिम सत्र परीक्षा! शाळांना २ मेपासून ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी


सोलापूर : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र देखील काही दिवसांत संपणार आहे. पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वी संपवली जाणार आहे.
त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन १ मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक दिली जातील. शाळांना २ जूनपासून सुटी लागणार आहे.



जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एक हजार ६३ शाळा आहेत. त्याअंतर्गत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास चार लाखांपर्यंत आहे. त्या सर्वच मुलांची आता अंतिम सत्र परीक्षा सुरु आहे. खासगी प्राथमिक शाळांनी देखील त्याचे नियोजन केले आहे. १५ एप्रिलनंतर १ मेपर्यंत शाळा सुरु राहणार आहे. पण, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे शाळांकडून बंधन घातले जात नाही.

कोरोनानंतर पहिल्यांदाच यंदा पूर्ण वर्षभर शाळा सुरळीत सुरु राहिल्या. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचा शिक्षकांकडून प्रयत्न झाला. पण, अजूनही बरेच विद्यार्थी विशेषतः: थेट पहिलीतून तिसरीत व तिसरीतून पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच आहे. त्यांच्याकडे उन्हाळा सुटीत लक्ष द्यावे लागणार आहे. शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्तीत जिल्ह्याचा टक्का वाढावा, यादृष्टीने स्वच्छेने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. १२ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत.

२ मेपासून शाळांना उन्हाळा सुट्ट्या

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची सत्र परीक्षा संबंधित मुख्याध्यापक त्यांच्या नियोजनानुसार घेत आहेत. १५ एप्रिलपूर्वी परीक्षा संपतील आणि १ मे रोजी सर्व विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तक दिली जातील. २ मे ते ११ जून, अशी उन्हाळा सुटी असणार आहे.

– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

परीक्षा न दिलेल्यांनाही मिळणार संधी

जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा घेतली जात आहे. पण, आजारी मुलांना किंवा कौटुंबिक अडचणींमुळे अनेक मुलांना नियोजित परीक्षेला येता येत नाही. अशावेळी त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्वात शेवटी त्यांची परीक्षा (पेपर लिहून घ्यावेत) घ्यावी, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सर्व मुख्याध्यापकांना सांगितले आहे. दरवर्षी तसेच केले जाते, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button