ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष किती जागांवर लढणार? संभाजीराजे म्हणतात…


पंढरपूर, सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले.

संभाजीराजे छत्रपती हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अजून काहीच ठरवलेले नसल्याचे स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले. निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीची समीकरणे बनतील ते पाहून ऐनवेळी आघाडीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

सध्या राज्यभर दौरे करून पक्षाची ताकद वाढवत असून पक्ष बांधणीची एकच लाईन ठरवली आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने समीकरणे बनतील त्यावेळी कोणत्या आघाडीत जायचे हे ठरवणार असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी राजे माढा लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उत्तर देताना सर्व 48 जागा लढवणार असल्याचे राजेंनी सांगितले.

केंद्रीय मंत्री राणे यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?



96 कुळी मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण नको या राणेंच्या वक्तव्यावर कोणतीही टिप्पणी करणे त्यांनी टाळले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत असे सांगत जे आरक्षण देणार असाल ते टिकणारे असावे असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजनांना आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांची भूमिका ही सर्व बहुजन समाज एका छताखाली राहावा अशीच होती. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनीही अठरापगड जातींना एकत्रित केले होते. मराठा आणि ओबीसी हे भाऊ असून काही मंडळी हे वातावरण बिघडवत असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. यावेळी स्वराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती यांनी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दौरे सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी येवला मतदारसंघात सभा घेत राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button