ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिवंत महिलेला तलाठ्याने दाखवले मृत; महसूल विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर!


वाशीम : सरकार गतिमान आणि पारदर्शक कारभाराचा कांगावा करीत असले तरी अधिकारी, कर्मचारी किती तत्परतेने वागतात याचा प्रत्यय दररोज येतोय. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.असाच गलथान कारभार मानोरा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेअंतर्गत चव्हाट्यावर आला. कारखेडा येथील एका वयोवृध्द जिवंत असलेल्या महिलेला तलाठ्याने दिलेल्या अहवालात चक्क मयत दाखविले. यामुळे निराधार असलेल्या रत्नाबाई देशमुख यांना हक्काच्या अनुदानापासून वंचित राहण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नाबाई रामराव देशमुख ८५ वर्षे यांच्या पतीचे निधन झाल्याने शासनाच्या श्रावण बाळ योजना अंतर्गत सन २००५ पासून मिळत असलेल्या अनुदानावर जीवन जगत आहेत. मात्र, काही महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याने बँकेत खाते तपासले असता अनुदान आले नसल्याची माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभाग गाठले. मात्र, तेथे धक्कादायक माहिती समोर आली.

चक्क तलाठ्याने सदर महिला मृत झाल्याचा अहवाल सादर केल्याने त्या महिलेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तलाठ्याने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे ८५ वर्षीय वृध्द महिलेने जीवन जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत महसूल विभाग त्या तलाठ्यावर काय कारवाई करणार असा सवाल केला जात असून बंद करण्यात आलेले अनुदान देऊन दोषी असलेल्या तलाठ्यावर कारवाई करावी. अशी मागणी त्या महिलेने केली आहे.

 

सन २००५ मध्ये मानोरा तहसील कार्यालयातून श्रावण बाळ योजना अंतर्गत रत्नाबाई देशमुख यांना पेन्शन योजना सुरू करण्यात आली. घरात एकटीच आणि वय झाल्याने रोज मजुरी होत नाही. त्यामुळे अनुदानाचा मोठा आधार त्यांना मिळत होता. परंतु बऱ्याच महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने बँकेत चौकशी केली असता अनुदान जमा झाले नाही. असे उत्तर मिळाले त्यामुळे सदर महिला नातेवाईकांसह मानोरा तहसील कार्यालयात गेल्यानंतर तलाठी सागर चौधरी यांनी सदर महिला मृत्यू झाली.असा अहवाल २९ जुलै २०२२ रोजी संजय गांधी कार्यालयात दिल्याने त्या महिलेचे अनुदान बंद झाले. तलाठ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे सदर महिलेवर उपासमारीची वेळ आली असून महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या मध्ये दोषी असलेल्या तलाठ्यावर महसूल विभाग काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button