औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने स्पष्ट केली भूमिका …

महाराष्ट्रातील औरंजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. तसेच सरकारने कबर न हटवल्यास कारसेवा करू, असा इशाराही बजरंग दलाकडून देण्यात आला आहे.
यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, यासंदर्भात आता शिवसेनेच्या ठाकरे गटानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरे गटाने त्यांचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यासंदर्भात भाष्य केलं आहे. औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रातच आहेत. त्याकडे शौर्याची स्मारके म्हणून बघायला हवं असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलं?
”काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे व स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करीत आहेत”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
”शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी २५ वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत”, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
”औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रातच आहेत. शौर्याची स्मारके म्हणून त्याकडे पाहायला हवे”, असं ही ठाकरे गटाने म्हटलं आहे.