म्हणून औरंगजेबाच्या कबरीला कोणी हात लावू शकत नाही; ‘हे’ आहे सर्वात मोठं कारण..

Aurangzeb : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरुन चांगलेच वातावरण तापले आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. त्या ठिकाणी आता एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे. त्यात 15 पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहे.
औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे.
औरंगजेब याची कबर हटवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय.
औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. असं ते म्हणाले. तर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये. अशी टीकाही त्यांनी केली.
म्हणून औरंगजेबाच्या कबरीला कोणी हात लावू शकत नाही…..
3 मार्च, 1707 साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली.
औरंगजेबच्या कबरीला एएसआय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संरक्षण मिळाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली हजारो स्मारके आहेत. या स्मारकांच्या यादीत औरंगजेबची कबर देखील आहे.
यामुळे कायद्याने या कबरीवर कारवाई करता येत नाही. काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली होती.