लोकशाही विश्लेषण

HIV :’एचआयव्ही’मुळे ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ८०० हून अधिक संक्रमित; कुठ आहे ‘एचआयव्ही’ चा हॉटस्पॉट?


HIV : त्रिपुरातून एक हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. त्रिपुरात गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसची (एचआयव्ही) लागण झाली आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (टीएसएसीएस) ने एका अहवालातून त्रिपुरातील धक्कादायक चित्र स्पष्ट केले आहे.



“आम्ही आतापर्यंत ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी ५७२ विद्यार्थी अजूनही जिवंत आहेत, तर एचआयव्हीची लागण झालेल्या ४७ लोकांनी आपले प्राण गमावले आहे,” असे सरकारी संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘एएनआय’ला सांगितले.

“बरेच विद्यार्थी त्रिपुरा बाहेर देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी स्थलांतरित झाले आहेत,” असेही अधिकाऱ्याने नमूद केले आणि ‘एचआयव्ही’च्या वाढत्या प्रसारावर प्रकाश टाकला. ही बातमी अनेकांना आश्चर्यचकित करणारी असली, तरी हा प्रदेश अनेक वर्षांपासून एचआयव्ही संसर्गाशी झुंज देत आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या संचालक डॉ. समरपिता दत्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “एचआयव्ही संसर्ग येथे नवीन नाही. राज्यात दरवर्षी या प्राणघातक आजाराची १५०० प्रकरणे नोंदवली जातात.” परंतु, यामागचे कारण काय? या प्रदेशात संसर्गाचा धोका का वाढत आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

संसर्गाचा धोका का वाढत आहे?

राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये एड्सच्या वाढत्या घटनांमागील प्राथमिक कारणांपैकी एक म्हणजे प्रचलित इंजेक्टेबल ड्रगचा वापर; ज्याला आयडीयू म्हणूनही ओळखले जाते. त्रिपुरातील विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात या ड्रगचे सेवन करतो. ‘टीएसएसीएस’च्या अहवालात असे आढळून आले आहे की, कोविड पूर्वीच्या काळात (२०१५ ते २०२०) आयडीयूचा प्रसार पाच टक्के होता. मात्र, कोविडनंतर (२०२०-२०२३) हा प्रसार १० टक्क्यांपर्यंत वाढला. १९९९ एचआयव्ही/एड्स पॉझिटिव्ह दर ०.५६ टक्के होता, जो २०२३-२४ मध्ये ०.९२ टक्क्यांपर्यंत वाढला आणि मे २०२४ पर्यंत १,७९० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली.

राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये एड्सच्या वाढत्या घटनांमागील प्राथमिक कारणांपैकी एक म्हणजे प्रचलित इंजेक्टेबल ड्रगचा वापर (छायाचित्र-पीटीआय)
गेल्या वर्षीच्या तुलनेत एचआयव्हीचे लैंगिक संक्रमण दोन टक्क्यांच्या खाली घसरले आहे. मात्र, रक्तातून याचा प्रसार सुरू आहे. त्यासाठी सुई कारणीभूत ठरत आहे. एकाच सुईचा वापर अनेकांवर केल्यामुळे याचा संसर्ग वाढत आहे. अहवालात १७ वर्षांची (एप्रिल २००७ ते मे २०२४) आकडेवारी देण्यात आली आहे, असे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. परंतु, डॉ. दत्ता यांनी चेतावणी दिली की, हे एचआयव्ही/एड्सचे आकडे वाढतच जातील, कारण संसर्ग पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकत नाही. “जे पॉझिटिव्ह टेस्ट करतात ते पॉझिटिव्ह राहतात आणि त्यांच्यामुळे संख्येत अजून वाढ होते”, असे त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार जुलै २०२३ पर्यंत त्रिपुरामध्ये एड्सच्या रुग्णांमध्ये मागील दहा वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

ड्रग वापराचा धोका

अहवालातील एका निष्कर्षातून असे दिसून आले आहे की, सामान्य प्रौढांपेक्षा इंजेक्टेबल ड्रग घेणार्‍यांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता ४३ पटीने जास्त आहे. हा निष्कर्ष राज्यातील तरुणांसाठी चिंतेचा आहे. त्रिपुरात आयडीयू घेणार्‍यांमध्ये ८७ टक्के लोक १६ ते ३० वयोगटातील आहेत. सर्वाधिक ड्रगचे सेवन करणारे विद्यार्थी २१ ते २५ वयोगटातील आहेत. हा सर्व शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी वर्ग आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, १५ वर्षांखालील १२ मुले इंजेक्टेबल ड्रग घेताना आढळून आली आहेत; तर ड्रगचे सेवन करणार्‍यांमध्ये २२ टक्के मुले १६ ते २० वयोगटातील आहेत.

विशेष म्हणजे यात श्रीमंत कुटुंबातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, यात अशा कुटुंबातील मुलांचा समावेश आहे, ज्यांचे पालक दोघेही सरकारी सेवेत आहेत आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. “जेव्हा पालकांना समजले की त्यांची मुले ड्रग्सला बळी पडली आहेत, तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता,” असे एका टीएसएसी अधिकाऱ्याने सांगितले.

संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य आहे का?

हा अहवाल समोर आल्यानंतर, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, सर्व बाधित विद्यार्थ्यांना नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (एनएसीओ) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अँटी-रेट्रोव्हायरल उपचार (एआरटी) मिळाले आहेत. काही विद्यार्थी हे उपचार अजूनही घेत आहेत. अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) ही एचआयव्ही/एड्ससाठीची एक उपचारपद्धती आहे; ज्यामध्ये शरीरातील विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.

ही उपचारपद्धती शरीरातील विषाणूचा प्रसार कमी करून रक्तातील एचआयव्हीची पातळी कमी करते; ज्याला ‘व्हायरल लोड’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवण्यास मदत मिळते आणि एड्सचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. एआरटीने एचआयव्हीला बरे करता येत नसले, तरीही याद्वारे संसर्गावर नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि एचआयव्ही असलेल्या लोकांना दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्यासही मदत होते.

मे २०२४ पर्यंत उपचारासाठी ८,७२९ लोकांची नोंद

“मे २०२४ पर्यंत आम्ही एआरटी केंद्रांमध्ये ८,७२९ लोकांची नोंदणी केली आहे. एचआयव्हीची लागण असलेल्या लोकांची एकूण संख्या ५,६७४ आहे. त्यापैकी ४,५७० पुरुष, तर १,१०३ महिला आहेत. त्यापैकी फक्त एक रुग्ण तृतीयपंथी आहे,” असे अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे. मार्चच्या सुरुवातीला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखरेखीच्या गरजेवर भर दिला होता. तसेच क्लब आणि संघटनांना तरुणांना अमली पदार्थांच्या सेवनाच्या धोक्यांबाबत शिक्षित करण्याचे आवाहन केले होते. विशेषत: इंट्राव्हेनस ड्रग्स वापरणार्‍या तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या एचआयव्हीच्या चिंतेने हे पाऊल उचलण्यात आले होते. या प्रदेशात एड्सविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. सरकारच्या उपाययोजनाही सुरू आहेत. ड्रग्सवरील प्रतिबंध, उपचार पद्धती आदींना प्राधान्य देऊन त्रिपुरा पुढील पिढ्यांसाठी एक निरोगी भविष्य घडवू शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button