आरोग्य

तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी होतो 60 लाख लोकांचा मृत्यू; 2030 पर्यंत जगात 80 लाखापेक्षा जास्त लोक गमावणार जीव !


कॅन्सर होण्यासाठी तंबाखू हा अतिशय घातक आणि कारणीभूत ठरणारा पदार्थ आहे. तंबाखू वापरणाऱ्यांपैकी ५० टक्के लोक तंबाखूच्या वापरामुळे मरतात.



 

चिपळूण : तंबाखूचे सेवन हे जागतिक स्तरावर मृत्‍यूचे प्रमुख कारण ठरत आहे. जगामध्‍ये दरवर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्‍यू हा तंबाखूच्या सेवनाने होतो. यापैकी ५४ लाख लोक हे तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे मरतात. ६ लाख लोक दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या धूम्रपानामुळे वातावरणात सोडलेल्या धुराचा प्रवेश त्यांच्या शरीरात झाल्यामुळे मरतात. तज्ज्ञांनी अभ्‍यासानुसार,‍ २०३० पर्यंत जगामध्‍ये ८० लाखापेक्षा जास्‍त लोकांचा मृत्‍यू हा तंबाखूच्‍या सेवनामुळे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती चिपळूणच्या ऑन्को-लाइफकेअर कॅन्सर सेंटरच्यावतीने (Onco-LifeCare Cancer Center) देण्यात आली आहे.

 

जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या (World No Tobacco Day) पूर्वसंध्येला सेंटरने आवाहन केले आहे की, कर्करोगासह अनेक दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन टाळण्याचे आवाहन चिपळूणच्या ऑन्को-लाइफकेअर कॅन्सर सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग, पक्षाघात/लकवा, फुप्फुसाचे आणि हृदयाचे आजार, टीबी, श्वसनसंस्थेचे विकार होतात.

 

कॅन्सर होण्यासाठी तंबाखू हा अतिशय घातक आणि कारणीभूत ठरणारा पदार्थ आहे. तंबाखू वापरणाऱ्यांपैकी ५० टक्के लोक तंबाखूच्या वापरामुळे मरतात. महाराष्ट्रात ४२ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रिया तंबाखूचा वापर करतात. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याचे जास्त प्रमाण असून वयाच्या आठव्या वर्षापासून मुले तंबाखू सेवन करतात, असा निष्कर्ष समोर आला आहे. आवाज बदलणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकल्यातून रक्त बाहेर पडणे, तोंडात न भरणारी जखम होणे, न दुखणारी जखम होणे, एखादी न दुखणारी गाठ वाढणे, अनैसर्गिक रक्तस्राव होणे आदी तंबाखूतून झालेल्या कॅन्सरची लक्षणे आहेत.

 

तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते. तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटिनाईन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसिन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय आणि जठराचा कर्करोग होतो. हे सारे टाळण्यासाठी वेळीच धूम्रपान करणं थांबवणं गरजेचं आहे.

 

तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देणे. शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होतो म्हणून वेळीच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपानाचे व्यसन टाळणे गरजेचे आहे.

-डॉ. अमोल पवार, ऑन्को-लाइफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button