ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावणे दोन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार महासन्मानचा लाभ


वाशिम : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
त्यानुसार १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पीएम किसानचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ३०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे जमा होणार आहेत. सदर योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

तसेच केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ या योजनेसाठी देखील लागू होणार आहेत. पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थींना देखील लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्याने पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना महासन्मान लाभ मिळणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल, अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हप्त्यापूर्वी तत्काळ केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी करुन घेणे अनिवार्य आहे. योजने अंतर्गत अपात्र असतानाही लाभार्थीस लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर रकमेची लाभधारकाकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी वसुली महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.

तीन हप्त्यात मिळणार प्रत्येकी २ हजार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महासन्मान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत वर्ग केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही योजनेचा निधी मिळणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button