ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

महाराष्ट्रात अति जोरदार पावसाचा इशारा; प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये


महाराष्ट्र : मुंबईत शुक्रवारी ( 28 जुलै) दिवसभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले आहेत.हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.



मुंबईत शुक्रवारी ( 28 जुलै) दिवसभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. वसई विरार आणि आजूबाजूच्या ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. दरम्यान जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई जवळच्या माथेरान येथे लक्षणीय पाऊस पडतोय. गेल्या 12 दिवसांत या प्रदेशात 2249 मीलीमीटर पाऊस पडल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशीही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या काही भागात 150-185 मिमी पाऊस पडला. पण 29 जुलैपासून येत्या 48 तासांत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होऊ शकते.

कोल्हापुरात गेल्या आठवड्यापासून कोल्हापुरात पावासचा जोर वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 5 स्वयंमचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांनी सांगितलं.

त्यामुळे काही गावातील लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर ज्याठिकाणी आणखी लोकांचं स्थलांतर करण्याची गरज भासली तरी ते निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. नदीपात्राजवळ राहणाऱ्या लोकांनी पाण्याची पातळी पाहण्यासाठी किंवा इतर कामासाठी नदीजवळ जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं. आहे.

सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या लादेवाडी येथील वारणा नदीची पाण्याची पातळी सध्या प्रचंड वाढलेली आहे. तसंच या नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलेलं आहे.

‘प्रशासन अॅक्शन मोडमध्ये’

दरम्यान, पाऊस जास्त झाल्याने लोकांचं नुकसान होतंय, ही वस्तुस्थिती आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (28 जुलै) विधानसभेत म्हटलं.

“पावसाचा वाढता जोर पाहता प्रशासन अॅक्शन मोड आहे. पूरप्रवण क्षेत्रातील लोक आणि दरड कोसळण्याची भीती आहे अशा ठिकाणच्या लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. तसंच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना दिली जाणारी मदतीची रक्कम वाढवली आहे,” असं शिंदे यांनी अधिवेशनात म्हटलं.

मुखयमंत्री म्हणाले, सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल.

विधानसभेत केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी वाढीव मदतीबाबत माहिती दिली.

सध्या घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपडयांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये असे 5 हजार रुपये देण्यात येतात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडी कुंडीच्या नुकसानीसाठी आता 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना कुठलाही दिलासा मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन आम्ही त्यांनाही आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

पावसाची ही स्थिती अशीच पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उद्याही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग, पुणे या संस्थेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांच्या मते, पुढील 24 तास ही स्थिती कायम राहणार आहे. राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भात संततधार

वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काल रात्री हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती.

वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट आणि पाऊस परिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुटी जाहीर करण्या आली आहे. अंगणवाडी केंद्रानाही सुट्टी जाहीर झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्वच शाळा बंद ठेवण्यात येत आहे.

कोल्हापुरात प्रशासन सज्ज

कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस सुरू असून पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी 40.05 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा एक दरवाजा सकाळी 4.24 मिनिटांनी बंद झाला असून सध्या 4 दरवाजांतून विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील पूरबाधित भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज, तरी संबंधित क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 5 इंचावर गेली आहे तर पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरण 100% भरलं आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून 8 हजार 540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाला स्वयंचलित वक्र आकाराचे सात दरवाजे असून सात पैकी तीन, चार, पाच, सहा आणि सात क्रमांकाचे दरवाजे आज सकाळी उघडले आहेत.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूर परिस्थिती हाताळण्याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, “कोल्हापूरमध्ये 45 फुटांपर्यंतचे जे क्षेत्र आहे उदा. सुतारवाडा. आणि अशा काही महत्त्वाच्या भागात महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासून लोकांना अलर्ट करत आहेत. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्याबाबतची जनजागृती कालपासूनच सुरू करण्यात आली होती.

2019 आणि 2021 मध्ये आलेल्या पुराचा लोकांना अनुभव आहे. त्यामुळे लोकांनी योग्य ती तयारी केली आहे आणि ते योग्य ते सहकार्य करत आहेत. कोल्हापूर ग्रामीण आणि करवीर तालुक्यातही याची तयारी झाली आहे. आंबेवाडीसारखं गाव ज्यांच्यावर कायम प्रभाव पडतो, त्या गावात पूर्ण तयारी झाली आहे. त्या गावात निवारागृहाची सोय करण्यात आली आहे.”

“या सर्व निवारागृहात लोकांच्या नीट राहण्याची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची जनावरांची राहण्याची, त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button