पालकमंत्री व जिल्हा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – (नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली), राधाकृष्ण विखे-पाटील – (नगर, सोलापूर), सुधीर मुनगंटीवार – (चंद्रपूर, गोंदिया), चंद्रकांत पाटील – (पुणे), विजयकुमार गावीत – (नंदुरबार), गिरीश महाजन – (धुळे, लातूर, नांदेड), गुलाबराव पाटील – (बुलढाणा, जळगाव), दादा भुसे – (नाशिक), संजय राठोड – (यवतमाळ, वाशीम), सुरेश खाडे – (सांगली), संदीपान भुमरे – (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत – (रत्नागिरी, रायगड), तानाजी सावंत -(परभणी), उस्मानाबाद (धाराशीव), रवींद्र चव्हाण – (पालघर, सिंधुदुर्ग), अब्दुल सत्तार – (हिंगोली), दीपक केसरकर – (म़ुंबई शहर, कोल्हापूर), अतुल सावे – (जालना, बीड), शंभुराज देसाई – (सातारा, ठाणे), मंगलप्रभात लोढा – (मुंबई उपनगर)
राज्यात नवे सरकार स्थापन होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटल्यावर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सर्वपित्री अमावास्येच्या पूर्वसंध्येचा ‘मुहूर्त’ लाभला आहे. या यादीवर भाजपचा वरचष्मा स्पष्टपणे दिसतो.
काही मंत्र्यांना अपेक्षित जिह्याचे पालकमंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे नाराजीनाटय़ निर्माण होणार आहे.
राज्याच्या नव्या सरकारमध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या न झाल्याने विकासकामे रखडली होती. 15 ऑगस्टला ध्वजवंदनासाठी पालकमंत्री नसल्याने तात्पुरते पालकमंत्री नियुक्त करण्यात आले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
पुन्हा नाराजीनाटय़
मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित खाते न मिळाल्याने मंत्र्यांमध्ये जशी नाराजी निर्माण झाली आहे तशीच नाराजी अपेक्षित जिल्हा न मिळाल्याने मंत्र्यांमध्ये निर्माण होणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिह्याची जबाबदार न देता धुळे, लातूर, नांदेडची जबाबदारी दिली आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांना संभाजीनगरऐवजी जालना, बीड जिह्याची जबाबदारी दिली आहे. मुंबईतील मंत्री नसल्याने सिंधुदुर्गातील दीपक केसरकर यांची मुंबईचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची वेळ आली आहे. ठाणे जिह्याचे पालकमंत्रीपद रवींद्र चव्हाण यांना न देता शंभुराज देसाई यांना देऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपला धक्का दिला आहे. प्रत्येक मंत्र्यांवर दोन ते तीन जिह्यांचे पालकमंत्रीपद सोपवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सहा जिह्यांचा भार सोपवला आहे.