“48 तासांत राहतं घर आणि अकरा गाड्या गमावल्या..” राणादाने सांगितली आयुष्यातील ‘ती’ अत्यंत वाईट आठवण…

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी राणादा म्हणून आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. हार्दिकने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींविषयी खुलासा केला.
हार्दिकने नुकतीच मित्र म्हणे चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने घरावर तो लहान असताना आलेली संकट, यात त्याने केलेला स्ट्रगल याविषयी खुलासा केला. लहानपणी एक अचानक आलेल्या संकटामुळे 48 तासांत त्यांचं राहतं घर आणि अकरा गाड्या गमवाव्या लागल्याचं त्याने सांगितलं.
तो म्हणाला,”2006 मध्ये आमचं राहतं घर आणि गाड्या 48 तासांत गेल्या. वडिलांना बिझनेसमध्ये लॉस झाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आमच्याकडे 11 गाड्या होत्या. दहावीच्या परीक्षेला दहा पेपरला दहा वेगवेगळ्या गाड्यांमधून गेलो आहे. पण अशी परिस्थिती असूनही आई मला खर्चाला तीन रुपये द्यायची. एक रुपया शाळेच्या बसला आणि 1.5 रुपया काहीतरी क्लास ते घरी असं बसचं तिकीट होतं त्याला.”
“माझ्या वडिलांचा लेदर आणि स्क्रॅपचा बिझनेस होता. तो बिझनेस आजोबानी सुरु केला आणि वडिलोपार्जित तो होता. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे स्क्रॅप माझे आजोबा घ्यायचे. वालचंद आणि माझे आजोबा खूप घट्ट मित्र होते. अँटॉप हिलला आधी आम्ही राहायचो. आजही वालचंद यांचा जुना बंगला तिथे आहे. त्यांच्या मुलांबरोबर माझ्या वडिलांनी काम केलं आहे. विश्वास नाही बसणार पण हिंदुस्थान मोटर्सच्या ज्या पहिल्या पाच फियाट आल्या होत्या त्यातील पहिली फियाट वालचंद यांची होती आणि दुसरी आमच्या घरी आली होती. इतकी सुबत्ता आणि घट्ट मैत्री होती.”
“पण पप्पा फॉरेन मध्ये लेदर निर्यात करायचे. ते लेदर निर्यात करणारे खूप मोठे व्यापारी होते. त्यानंतर आमचे टॉवेल्सही निर्यात करायचो. सोलापूर चादरी, टॉवेल्स निर्यात करण्याची सुरुवात माझ्या बाबांनी केली. पण 2006 मध्ये अचानक आम्हाला नुकसान झालं. 48 तासांच्या आत आमचं घर, गाड्या सगळं विकावं लागलं. पण आई-बाबांचं गावचं घर आहे तर आम्ही गावी शिफ्ट झालो.”
“मी कधीच लोकलने प्रवास केला नव्हता पण पहिल्यांदा मोठा प्रवास केला तो बोईसर ते दादर. आम्ही मग गावी बोईसरला शिफ्ट झालो. तेव्हा कुणाला विश्वास नाही बसणार पण तेव्हा लोकल नव्हत्या. त्यावेळी शटल किंवा मेमो होत्या. मी पहाटे तीनला उठायचो. चारची एसटी पकडून मी पहिली मेमो पकडून सहा वाजता विरारला यायचो. तिकडून लोकल पकडून दादरला खालसा कॉलेजला यायचो. हा प्रवास मी वर्षभर केला. मी रोज कॉलेजला यायचो. माझं पहिलं लेक्चर कायम मिस व्हायचं. नंतर मग वर्षभराने पुन्हा थोडं स्थिरस्थावर झालं आणि आम्ही मुंबईला भाड्याने घर घेतलं.”











