आजीच्या अंत्यविधीची तयारी, नाकात कापूस, नातवाला संशय आला; दुसऱ्या दिवशी 103 वा वाढदिवस साजरा…

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डात एक विलक्षण आणि थक्क करणारी घटना घडली. तब्बल 103 वर्षांच्या गंगाबाई सावजी साखरे यांना मृत समजून त्यांच्या अंत्यविधीची संपूर्ण तयारी करण्यात आली होती.
मात्र, अवघ्या दोन तासांतच त्यांच्या पायाच्या बोटांची हालचाल दिसून आली आणि गंगाबाई जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले.
गंगाबाई साखरे या मूळच्या चारगाव (ता. रामटेक) येथील असून सध्या त्या रामटेकच्या आंबेडकर वॉर्डात आपल्या मुलगी कुसुमा अंबादे यांच्या घरी वास्तव्यास होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी असून पूर्णतः बेडरेस्टवर होत्या. त्या बोलू शकत नव्हत्या आणि दररोज केवळ पाण्यावर त्यांचा दिनक्रम सुरू होता. वयाच्या शतकापलीकडे पोहोचलेल्या गंगाबाईंची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने कुटुंबीय सतत काळजीत होते.
12 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास गंगाबाईंच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. श्वासोच्छ्वासही थांबल्यासारखा वाटल्याने कुटुंबीयांनी त्यांना मृत समजले. त्यानंतर लगेचच नातेवाईकांना फोनवरून निधनाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियावरही वार्ता पसरली. घरासमोर मंडप उभारण्यात आला, अंत्ययात्रेची वेळ निश्चित करण्यात आली आणि शववाहिनीची व्यवस्था करण्यात आली. अंत्यसंस्काराच्या तयारीनुसार गंगाबाईंना नवीन वस्त्रे घालण्यात आली, हात-पायांची बोटे बांधण्यात आली आणि नाकात कापूस ठेवण्यात आला.
दरम्यान, सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास नातू राकेश साखरे यांचं लक्ष गेलं आणि अचानक आजीच्या पायाच्या बोटांची हालचाल झाली. सुरुवातीला विश्वास न बसल्याने त्यांनी बारकाईने पाहणी केली. त्वरित बोटांची बांधणी सोडण्यात आली आणि नाकातील कापूस काढण्यात आला. तेवढ्यात गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. ही बाब पाहून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. मृत समजलेल्या आजी जिवंत असल्याचे लक्षात येताच अंत्यविधीची सर्व तयारी तात्काळ रद्द करण्यात आली.
निधनाची बातमी मिळाल्याने जम्मू-काश्मीर, बालाघाट यांसह दूरदूरच्या भागांतून काही नातेवाईक रामटेककडे रवाना झाले होते. काहीजण हार-फुले घेऊन पोहोचले, मात्र आजी जिवंत पाहून सर्वांनाच धक्का बसला. विशेष बाब म्हणजे 13 जानेवारी रोजी गंगाबाईंचा वाढदिवस होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना जणू ‘नवजीवन’ मिळाल्याच्या भावनेतून साधेपणाने वाढदिवस साजरा केला. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तांदूळ निवडण्याइतकी दृष्टी चांगली असलेल्या गंगाबाईंची ही घटना सध्या रामटेक शहरात चर्चेचा विषय ठरली असून, अनेक जण याला चमत्कार मानत आहेत.











