भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये काय सुरू आहे? पंतप्रधान शरीफ यांनी बोलावलीये महत्त्वाची बैठक …

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर ‘नंतर ‘नंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाइन ऑफ कंट्रोल (LOC) वर पाकिस्तानकडून सतत सीझफायरचे उल्लंघन केले जात आहे. पुंछ राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानच्या या कृतीला भारतीय लष्करही योग्य प्रत्युत्तर देत आहे.
भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने लाहोर, इस्लामाबाद आणि सियालकोट हे एअरपोर्ट पुढील ४८ तासांसाठी बंद केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने आपला एअरस्पेसही बंद केला असून सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.
माहितीनुसार, इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील आदेश येईपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लाहोर विमानतळावरून देखील उड्डाण सेवा थांबवण्यात आली आहे. कतार, दुबई, बहारीन, कुवैत आणि रियाध येथून येणारी २५ हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज ७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ‘नेशनल सिक्युरिटी कमिटी’ची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर लिहिलंय की, “पाकिस्तान भारताच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हा हल्ला पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन आहे. या हल्ल्यामुळे क्षेत्रीय शांततेला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अनुच्छेद ५१ अंतर्गत उत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि क्षेत्रीय अखंडतेचे संरक्षण करू.”
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ही कारवाई केली आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील आतंकी संघटनांच्या अड्ड्यांचा नायनाट केला आहे. भारताने ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केले असून या कारवाईत दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.