देश-विदेश

मोदींच्या निवासस्थानी आज 4 हाय लेव्हल मिटिंग, पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे


पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका सुरू आहेत.

काल रात्रीही मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला संरक्षण दलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्रीही उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींची भेट घेऊन पहलगाम हल्ल्यावर चर्चा केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदींच्या निवासस्थानी बैठक होत आहे. ही बैठक निर्णायक मानली जात आहे. भागवत यांच्या मोदी भेटीनंतरच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व आलं असून या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं मानलं जात आहे.

 

भारताने अतिरेक्यांचा सफाया करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला फ्रि हँड दिला आहे. तुम्ही टार्गेट ठरवा आणि वेळ ठरवा असं मोदींनी सैन्याला स्पष्ट केलं आहे. तसेच निर्णय घेण्याचे अधिकारही मोदींनी सैन्याला दिले आहेत. त्यामुळे युद्धाचे ढग जमू लागले असून मोदींच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज एकूण चार हाय लेव्हल बैठका होणार आहेत. यातील एक बैठक 11 वाजता सुरू झालीय. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपचे नेते जेपी नड्डाही उपस्थित राहणार आहेत.

 

चार बैठका

मोदींच्या निवासस्थानी आधी 11 वाजता कॅबिनेट सुरक्षा समितीची (CCS) बैठक होईल. त्यानंतर मोदींच्या अध्यक्षतेत CCPA ( Cabinet Committee on Political Affairs)ची बैठक होईल. त्यानंतर आर्थिक प्रकरणाची कमिटी (CCEA)ची तिसरी बैठक होणार आहे. नंतर शेवटची आणि चौथी बैठक कॅबिनेटची होणार आहे. या तिन्ही बैठकांमध्ये निर्णय घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. त्यामुळे या चारही बैठकांकडे जगाचं लक्ष लागलं आहे. खासकरून चौथ्या बैठकीकडे अधिक लक्ष लागलं आहे. या बैठकीतून कोणता निर्णय घेतला जातो हे स्पष्ट होणार आहे.

 

निर्बंध लादणार?

या चारही बैठकांमध्ये पाकिस्तानवर युद्ध करण्यापासून ते पाकिस्तानवर आणखी कोणते आर्थिक निर्बंध लादता येईल याचीही चर्चा केली जाणार आहे. तसेच युद्ध झाल्यास देशावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि अशा प्रसंगात भारताच्या बाजूने कोण कोण राहू शकतात याच्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच आज पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक असणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button