जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या …

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्याच्या सहाव्या दिवशीच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
शनिवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी कुपवाडामधील कंडी येथे हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिकाला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ४५ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल मगरे जखमी झाले. गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले पण उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी मध्यरात्री उशिरा कांदी खास येथील सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल मगरे यांच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात सामाजिक कार्यकर्ते गुलाम जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्त्याला का लक्ष्य केले? हे अद्याप कळलेले नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात ६३ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सुरक्षा यंत्रणांनी छापे टाकण्यात आले आहेत आणि १,५०० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकट्या अनंतनागमधून १७५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी श्रीनगर आणि इतर अनेक ठिकाणी दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत आणि संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे दहशतवादी, लॉजिस्टिक आणि ग्राउंड सपोर्ट देण्याव्यतिरिक्त, पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देखील देतात. यापैकी तीन हिजबुल मुजाहिदीनशी, आठ लष्कर-ए-तोएबाशी आणि तीन जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २ परदेशी पर्यटकांसह २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून अनेक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. काश्मीरमधील लष्कर अधिकाऱ्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. अनेकांना अटक तर काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.