देश-विदेश

पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?


काश्मीर खोऱ्यातील मिनी स्विझरलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम इथं दहशतवाद्यांना २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सरकारने सैन्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सौदीवरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेबाबत विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यातच सुरुवातीच्या तपासात गुप्तचर यंत्रणांनी पहलगामचे दहशतवादी भारतात कुठून घुसले याचा शोध घेतला आहे. पीर पंजालच्या डोंगराळ भागातून हे दहशतवादी भारतात आले. त्यानंतर राजौरीवरून चत्रु, मग वधावनमार्गे ते पहलगामपर्यंत पोहचले असं तपासात समोर आले.

हा संपूर्ण परिसरात रियासी आणि उधमपूर जिल्ह्यात येतो जिथं गुज्जर आणि बकरवाल समुदायाची मोठी लोकसंख्या आहे. हा मार्ग दहशतवाद्यांनी याचसाठी निवडला असावा जेणेकरून सामान्य लोकांच्या आड लपून ते प्रवास करू शकतील असा अंदाज आहे. पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस, सशस्त्र सुरक्षा दलासह विविध संस्थांनी भारत-नेपाळच्या सोनौली सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. या भागातून दहशतवाद्यांचा मार्ग रोखण्यासाठी सीमा ओलांडण्यापू्र्वी प्रत्येकाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भीती

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे बारामुल्ला परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले, हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले. यातच आता पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची धास्ती घेतली आहे. कालपासूनच पाकिस्तानने हवाई दलाला अलर्ट दिला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने गस्त वाढवला आहे. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून २६ जणांची हत्या केली आहे. देशाच्या विविध भागांतून काश्मीरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर लोक सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश

पहलगामच्या बैसरन घाटीतच दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं. या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्रातील ६ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींमध्येही महाराष्ट्रातील काही नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तर रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button