
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदेनी शिवसेनेच्या जवळपास दोन तृतियांश आमदारांना फोडल्यामुळे पक्षात मोठी फळी निर्माण झाली आहे.
शिवसेनेसोबत बच्चू कडूंसारख्या काही अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदेंना आहे. शिवसेना आणि अपक्षांसोबत काही काँग्रेस आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली आहे.
अपक्षांना मिळून हा आकडा ५० पर्यंत जाण्याची शक्यता
सध्या मी गुवाहाटीत आहे. आज सर्व बंड केलेल्या आमदरांची बैठक होणार आहे. रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढची योजना आखली जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. सध्या गुवाहाटीत शिवसेना आणि अपक्षांचे मिळून ३६ आमदार एकत्र आहेत. आणखी ३ ते ४ आमदार येणार असून केवळ शिवसेनेच्या आमदारांचा आकडा ३९ पर्यंत जाईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तर अपक्षांना मिळून हा आकडा ५० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.